करुणाष्टके

विकिबुक्स कडून

प्रस्तावना[संपादन]

          राष्ट्रगुरू म्हणून समर्थ रामदास सर्व महाराष्टाला वंदनीय आहेत. धार्मिक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक सर्वच क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीयच नव्हे तर प्रशंसनीय आहे. समर्थांनी विपुल ग्रंथरचना केली आहे. ग्रंथराज दासबोध जीवनातील सर्वच अंगांना स्पर्श करतो. श्री आत्माराम व मनाचे श्लोक विवेक व वैराग्याची शिकवण देतात. रामदासांचे अभंग व करुणाष्टके रामावरील अतूट भक्तीचे द्योतक आहेत. समर्थांची करुणाष्टके कारुण्यपूर्ण भक्तीरसाने भरलेली आहेत. संसारतापाने होरपळून निघणाऱ्या मनाला शांतता लाभावी म्हणून यांत ते “ जळत ह्रदय माझे जन्म कोटयानुकोटी। मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी” अशी विनवणी करतात. ”तुजवीण रामा मज कंठवेना “ या करुणाष्टकात “ आम्हा आनाथा तूं एक दाता। संसारवेथा चुकवी समर्था “ अशी प्रार्थना करतात. “बुध्दि दे रघूनायका” या करुणाष्टकात आपल्या व्यक्तिमत्वाचे परखड परिक्षण करून रघुनाथाकडे सद्गुणांची ,सावधानतेची.भिक्षा मागतात.त्यातून त्यांची विनयशीलता व विचारशक्ती दिसून येते.           करुणाष्टके म्हणजे करुण-रसाने भरलेली आठ भक्तीगीते. परंतु सध्या सहाच करुणाष्टके उपलब्ध आहेत. ही एकदा वाचली की, रोजरोज परत परत वाचाविशी वाटतात.

करुणाष्टके[संपादन]

मागणे हेंचि आतां[संपादन]

नको द्रव्य दारा नको येरझारा ।
नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा।
सगुणी मज लावि रे भक्तिपंथा।
रघूनायका मागणे हेचि आतां।

भावार्थ श्री समर्थ रामदासांना कामिनी कांचनाचा मोह नाही. कारण त्यामुळे माणूस जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतो असे रामदासांचे मत आहे. त्यांना ज्ञानमार्गाची लालसा नाही. कारण ज्ञानामुळे मनात गर्वाचा फुगारा निर्माण होतो. त्यांना सगुण भक्तीचा मार्ग अधिक पसंत आहे. या सगुण भक्तीची ते रामाकडे मागणी करीत आहेत.

भवे व्यापिलो प्रीतिछाया करावी।
कृपासागरे सर्व चिंता हरावी।
मज संकटी सोडवावे समर्था।
रघूनायका मागणे हेचि आतां।।6।।

भावार्थ संसाररुपी संकटे व चिंता यांनी व्याप्त झालेल्या आपल्या मनाला श्री रामाने प्रीतीछाया देवून शांत करावे. ते कृपासागर असून सर्व संकटे व चिंता यापासून आपली सुटका करावी अशी विनंती समर्थ रघुनायकाला करीत आहेत.

मनी कामना कल्पना ते नसावी।
कुबुध्दी कुडी वासना नीरसावी।।
नको संशयो तोडि संसारवेथा।
रघूनायका मागणे हेंचि आतां।।७॥

भावार्थ मनात निर्माण होणाऱ्या अनंत कामना व अमर्याद कल्पना, कुबुध्दी व वाईट वासना यांचे निरसन व्हावे. संसारातील दु:खे, मानसिक व्यथा, संशय यांचा निरास व्हावा अशी विनंती समर्थ रघुनाथाला करीत आहेत.

समर्थापुढे काय मागो कळेना ।
दुराशा मनी बैसली हे ढळेना ।
पुढे संशयो नीरसी सर्व चिंता ।
रघूनायका मागणे हेंचि आता।।८॥

भावार्थ आपल्या मनात दुराशा, चिंता व संशय यांनी घर केले आहे. त्यांनी मन भरून गेले आहे. विचारांची गती कुंठीत झाली आहे. रघुनायकाकडे काय मागणे मागावे हे कळेनासे झाले आहे. तरीही संशय निरसून सर्व चिंता दूर कराव्यात अशी विनंती श्री समर्थ करीत आहेत.

ब्रिदाकारणे दीन हाती धरावे।
म्हणे दास भक्तांसि रे उध्दरावे।
सुटो ब्रीद आम्हासि सांडूनी जाता।
रघूनायका मागणे हेंचि आतां।।9॥

भावार्थ दिनानाथ हे रघुनाथाचे ब्रीद असल्यामुळे त्यांनी दीनांना हाती धरावे. प्रेमळ भक्तांचा उध्दार करावा. त्यांची उपेक्षा केल्यास रघुनायकाचे ब्रीद खोटे ठरेल. आपले वचन सांभाळण्यासाठी तरी श्री रामाने आपल्यावर कृपा करावी. अशी निर्वाणीची मागणी श्री समर्थ या करुणाष्टकात करीत आहेत.

भक्ती व करुण रसाने ओथंबलेली ही करुणाष्टके वाचून आपल्याला श्री समर्थांच्या मन:स्थितीची पूर्ण कल्पना येते आणि मन त्यात नकळत गुंतून जाते. ती परत परत वाचाविशी वाटतात.

दीन हाती धरावे[संपादन]

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान काही ।
नसे प्रेम हे राम विश्राम नाही ।।
असा दीन अज्ञान मी दास तूझा ।
समर्था जनी घेतला भार माझा ।।१।।

अर्थ -- प्रारंभीच समर्थांनी आपल्या व्यतिमत्वाचे परीक्षण करून आपले दोष वर्णन केले आहेत. ज्ञान, भक्ती व मनाची एकाग्रता यापैकी एकही गुण आपल्याकडे नाही तसेच मनात प्रेम व शांती नाही. आपण अत्यंत अज्ञानी, दीन असूनही रघुनायकाने आपला भार (जबाबदारी) स्विकारला आहे.

रघूनायका जन्म जन्मांतरीचा ।
अहंभाव छेदून टाकी दिनाचा।।
जनी बोलती दास या राघवाचा।
परी अंतरी लेश नाही तयाचा ।।२।।

अर्थ-- सर्व लोकांत रामांचा दास म्हणून ओळखला जात असूनही श्रीरामांच्या अनेक गुणांपैकी एकही गुण आपल्यात दिसून येत नाही उलट अहंकारासारखे अनेक दोष आहेत अशी कबुली देऊन हा अहंकार छेदून टाकून गुणांची वृद्धी करावी, भवसागरातून तरून जाण्यासाठी मदत करून उध्दार करावा अशी कळकळीची विनंती समर्थ करीत आहेत.

रघूनायका दीन हाती धरावे । 
अहंभाव छेदुनिया उध्दरावे ।।
अगूणी तयालागि गुणी करावे ।
समर्थे भवसागरी उतरावे ।।3।।

अर्थ-- रघुनायकाने दीन भक्तांना हाताशी धरावे. त्यांचा अहंभाव छेदून टाकून सद्गुणांची वृध्दी करावी. संसाररुपी सागरातून तारुन न्यावे अशी रामदासांची मनापासून इच्छा आहे.

किती भार घालू रघूनायकाला ।
मजकारणे शीण होईल त्याला ।।
दिनानाथ हा संकटी धाव घाली ।
तयाचेनि हे सर्वकाया निवाली ॥४॥

अर्थ-- श्रीराम हे दीनांचे नाथ असून भक्तांची संकटातून सुटका करतात. त्यांच्या केवळ दर्शनाने देह व मनाची शांती होते. अशा रघुनायकावर आपण फार मोठा भार घालीत आहोत, त्यामुळे त्यांना शीण होईल अशी अपराधीपणाची भावना या करुणाष्टकात व्यक्त झाली आहे.

मज कोंवसा राम कैवल्यदाता ।
तयाचेनि हे फीटली सर्व चिंता ।।
समर्था तया काय उत्तीर्ण व्हावे ।
सदा-सर्वदा नाम वाचे वदावे ।।५ ।।

अर्थ --- श्री राम हा कैवल्यदाता असून तो सर्व चिंताचे हरण करणारा आहे. त्यांच्या या उपकाराची फेड केवळ सदासर्वदा रामनामाचा जप करूनच होईल असा विश्वास समर्थ रामदास प्रकट करतात.

दिनाचें उणे दीसतां लाज कोणा ।
जनीं दास दिसे तूझा दैन्यवाणा ।।
शिरीं स्वामि तूं राम पूर्णप्रतापी ।
तुझा दास पाहे सदा शीघ्रकोपी ।।६।।

अर्थ-- आपले स्वामी रघुनाथ हे पूर्णप्रतापी (पराक्रमी) असूनही त्यांचा दास मात्र दैन्यवाणा व शीघ्रकोपी (चटकन रागवणारा ) आहे. दासाची ही उणीव स्वामींना उणेपणा आणणारी आहे.अशी लीनता श्री समर्थ प्रांजळपणे व्यक्त करतात. स्वत:च्या गुणदोषांचे , उणेपणाचे मार्मिक, परखड परीक्षण करुन ते उघडपणे मांडण्याचा प्रांजळपणा, स्वामीभक्ती, विनयशीलता हे दुर्मिळ गुण या करुणाष्टकात पहावयास मिळतात व मस्तक आदराने लीन होते.

बुध्दी दे रघूनायका[संपादन]

युक्ति नाही बुध्दी नाही विद्या नाही विवंचिता।
नेणताभक्त मी तूझा बुध्दी दे रघूनायका।।1।।
मन हे आवरेना कीं वासना वावरे सदा ।
कल्पना धावते सैरा बुध्दी दे रघूनायका ।।२।।
अन्न नाही वस्त्र नाही सौख्य नाही जनांमध्ये।

आश्रयो पाहता नाही बुध्दी दे रघूनायका ।।३।।

बोलता चालता येना कार्यभाग कळेचना।
बहु मी पीडिलो लोकी बुध्दी दे रघूनायका ।।४।।
तुझा मी टोणपा जालो कष्टलो बहुतांन परी ।
सौख्य तें पाहतां नाहीं बुध्दी दे रघूनायका ।।५।।
नेटके लिहितां येना वाचितां चुकतों सदा ।
अर्थ तो सांगता येना बुध्दी दे रघूनायका ।।६।।

प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घसूचना ।
मैत्रिकी राखितां येना बुध्दी दे रघूनायका ।।७।।

अर्थ--

या करुणाष्टकात समर्थ रामदास रघुनायकाकडे बुध्दीचे वरदान मागत आहेत.आपल्याला युक्ती, बुध्दी, विद्या ह्यांपैकी काही नसून आपण रघुनायकाचा अत्यंत अज्ञानी भक्त आहोत असे अत्यंत विनयाने सांगत आहेत. मनांत सतत वासनांचा धुमाकूळ चालू असून ते अनावर झाले आहे. मनामध्ये नाना प्रकारच्या कल्पना सैरावैरा धावत आहेत. या चंचल मनाला सावरण्यासाठी संयमाची गरज असून तिची मागणी समर्थ रामदास रघुनायकाकडे करीत आहेत.आपणाकडे पुरेसे अन्न, वस्त्र नाही तसेच लोकांमध्ये मैत्रीची भावना नाही त्यामुळे कुणाचाही आसरा नाही अशी खेदाची भावना ते व्यक्त करतात. आपल्याला योग्य रितीने वागता किंवा बोलता येत नाही त्यामुळे कार्यभाग साधता येत नाही व मनाला खूप वेदना होतात असे कळकळीने सांगून समर्थ रघुनायकाकडे बुध्दी देण्याची प्रार्थना करतात.

         आपण श्रीरामाचा केवळ बुध्दीहीन टोणपा (कष्टाळू  पशूप्रमाणे) आहोत व जीवनात कोणत्याही प्रकारचे सौख्य नाही यासाठी समर्थ श्रीरामाची करूणा मागत आहेत.

आपणास नेटके लिहिता येत नाही, वाचतांना चुका होतात, अर्थ सांगता येत नाही. अशा अनेक उणिवा आहेत त्यावर मात करण्यासाठी श्री समर्थ बुध्दीची देणगी मागत आहेत. आपणास योग्य प्रसंग किंवा वेळ ओळखता येत नाहीं तसेच भविष्यात काय करावं याविषयी अचूक सूचना सुचत नाही. लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जोडता येत नाही हे साधण्यासाठी रघुनायकने आपणास चातुर्य द्यावे अशी विनंती श्री समर्थ आपल्या स्वामींना करतात.

संसारी श्र्लाघ्यता नाही सर्वही लोक हासती।
विसरू पडतो पोटी बूध्दि दे रघूनायका ।।८।।
चित्त दुश्चित्त होत आहे ताळतंत्र कळेचिना ।
आळसू लागला पाठी बुध्दि दे रघूनायका ।।९।।
कळेना स्फूर्ति होईना आपदा लागली बहु ।
प्रत्यहीं पोट सोडीना बुध्दि दे रघूनायका ।।१०।।
संसार नेटका नाही उद्वेगू वाटतों जिवीं । 

परमार्थु कळेना कीं बुध्दि दे रघूनायका ।।११।।

देईना पुर्विना कोणी उगेचि जन हांसती ।
विसरु पडतो पोटी बुध्दि दे रघूनायका ।।१२।।
पिशुने वाटतीं सर्वे कोणीही मजला नसे ।
समर्था तू दयासिंधु बुध्दि दे रघूनायका ।।१३।।

अर्थ-- जगात कोणी कौतुकास्पद शब्द उच्चारत नाही. उलट सर्व लोक कुचेष्टेने हसतात. सावधानता नसल्याने काही गोष्टींचा विसर पडतो. यासाठी श्री समर्थ सावधानी बुध्दीची श्रीरामाकडे याचना करीत आहेत.

उदास वाटते जीवीं आतां जावें कुणीकडे ।
तू भक्तवत्सला रामा बुध्दि दे रघूनायका ।।१४।।

अर्थ -- आपल्या मनांत उदासीनता दाटून आली आहे. मदतीसाठी कुणाकडे जावे हे कळेनासे झाले आहे. श्रीराम हे भक्तवत्सल आहेत त्यांनी योग्य मार्ग सुचवून या परिस्थितीतून सुटका करावी अशी प्रार्थना करतात.

काया-वाचा-मनोभावे तुझा मी म्हणवीतसें ।
हे लाज तुजला माझी बुध्दि दे रघूनायका ।।१५।।

अर्थ--

काया, वाचा, मनाने आपण केवळ रघुनायकाचे आहोत. तेव्हा आता आपली लाज राखणे केवळ रघुनायकालाच शक्य आहे. त्यांनी आपली लाज राखावी अशी विनंती श्री समर्थ रघुनायकाला करतात.

सोडविल्या देवकोटी भूभार फेडीला बळे ।
भक्तांसी आश्रयो मोठा बुध्दि दे रघूनायका ।।१६।।

अर्थ--

श्री रामांनी अनेक कोटी देवांची बंधनातून सुटका केली आहे, पृथ्वीचा भार हलका केला आहे. प्रेमळ भक्तांना फक्त रघुनायकाचाच आधार वाटतो. तेव्हा स्वामींनी आपल्याला चांगली बुध्दी देवून उपकृत करावे.

उदंड भक्त तुम्हाला आम्हाला कोण पुसतें ।
ब्रीद हे राखणें आधी बुध्दि दे रघूनायका ।।१७।।

अर्थ--

रघुनायकांना उदंड भक्त असून ते आपली कदाचित उपेक्षा करतील, परंतु आपले वचन खरे करण्यासाठी तरी रघुनायकाने आपल्याला योग्य मार्ग सुचवावा. असे श्री समर्थ म्हणतात.

उदंड ऐकली किर्ति पतितपावना प्रभो ।
मी एक रंक दुर्बुध्दि, बुध्दि दे रघूनायका ।।१८।।

अर्थ--

आपण आपल्या प्रभूची उदंड कीर्ती ऐकली आहे. ते पतितपावन आहेत पण आपण एक दुर्बुध्द, दरिद्री भक्त असून सारासार बुद्धी देवून रघुनायकाने आपणास मदत करावी अशी आशा श्री समर्थ करीत आहेत.

आशा हे लागली मोठी दयाळू बा दया करीं।
आणिक न लगे कांही बुध्दि दे रघूनायका ।।१९।।

अर्थ--

श्री राम हे अत्यंत दयाळू असून त्यांनी आपल्याला सद्बुद्धी देऊन दया करावी यापेक्षा अधिक काहीही मागणी नाही असे श्री समर्थ आवर्जून सांगतात.

रामदास म्हणे माझा संसार तुज लागला।
संशयो पोटीं बुध्दि दे रघूनायका ।।२०।।

अर्थ- -

रामदासांनी पूर्ण शरणागती पत्करून आपली सर्व जबाबदारी रघुनायकावर सोपविली आहे, तरीही मन शंकाग्रस्त आहे. अत्यंत काकुळतीने ते रघुनायकाची करूणा मागत आहेत.