महाराष्ट्र

विकिबुक्स कडून

साचा:मुखपृष्ठ सदर टीप

 
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-noid/mr

साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-search/mr

साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-newitem/mr
माध्यमे अपभारण करा

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१० चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास "संतांची भूमी" असेदेखील म्हटले जाते. येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेटपटू तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेटपटू महाराष्ट्रातले आहेत. मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत.

नावाचा उगम[संपादन]

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. .काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर " व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.[१] चक्र्धर स्वामी यांनी "महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे' अशी व्याख्या केली आहे.[२]

इतिहास[संपादन]

या विषयाचा विस्तृत लेख पहा - महाराष्ट्राचा इतिहास

अजिंठ्यातील लेणी

महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी, पर्वत, स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. उपलब्ध ऐतिहासिक साधनातून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडांत व्यापले होते.

मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य[संपादन]

महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात महाराष्ट्राचा इतिहास तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. त्या काळात हा 'दंडकारण्याचा' भाग होता. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते, परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगिरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेले शालिवाहन शक पंचांग आजही रूढ आहे. त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.

मराठे व पेशवे[संपादन]

छत्रपती शिवाजी महाराज

१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ साली राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली. शिवाजीराजांचे पुत्र संभाजी राजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्याची सूत्रे छ्त्रपतींचे प्रतिनिधी म्हणजेच पेशव्यांच्या हातात गेली. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.

ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ[संपादन]

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान बसवल्यावर मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले. महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात (मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये) कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या प्रभुत्वाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या पक्षपाती निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणीवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती[संपादन]

हुतात्मा स्मारक,मुंबई

या विषयावरील विस्तृत लेख पहा - संयुक्त महाराष्ट्र चळवळ

ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली. अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.

भौगोलिक स्थान[संपादन]

महाराष्ट्रातील पर्वत
कोकण

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेलाआहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. साचा:भौगोलिक स्थान

प्रशासन[संपादन]

मंत्रालय:महाराष्ट्र राज्य

भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात. महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते. महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या निवडलेले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉॅंग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉॅंग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉॅंग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला.१९९९ नंतर १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली.२०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपा शिवसेना युतीची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली असून राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

विभाग[संपादन]

महाराष्ट्र राज्याचे विभाग

या विषयाचा विस्तृत लेख महाराष्ट्रातील जिल्हे

महाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , औरंगाबाद , कोकण , नागपूरअमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत. भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग). २०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली, त्यामुळे एकूण जिल्ह्यांची संख्या वाढून ३६ एवढी झालेली आहे.
हेसुद्धा पहा
महाराष्ट्रातील तालुके

अर्थव्यवस्था[संपादन]

चित्र:मुंबई शेयर बाजार.jpg
मुंबई शेअर बाजार

राज्याचे वार्षिक उत्पन्न पुढील तक्त्यात दिले आहे. स्रोत सांख्यिकी मंत्रालय, भारत सरकार (आकडे- कोटी रु.)

वर्ष वार्षिक उत्पन्न
१९८० १६,६३१
१९८५ २९,६१६
१९९० ६४,४३३
१९९५ १,५७,८१८
२००० २,३८,६७२

सन १९७०नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारताच्या अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले. आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे[ संदर्भ हवा ]. राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारताच्या दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो.

  • महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलियम आणि तत्सम उद्योग हे आहेत.
  • इतर महत्त्वाचे उद्योगधंदे - धातू उत्पादने, वाईन (द्राक्षापासून तयार केले जाणारे मद्य), दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स.
  • महत्त्वाची पिके- आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये.
  • महत्त्वाची नगदी पिके - शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू. माहाराष्ट्रातील सिंचनाखालील जमीन ३३,५०० चौ.कि.मी. इतकी आहे.

मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बॅंका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. भारताच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई आहे. मुंबई शेअर बाजार (भारताच्या सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेअर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत. कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त S&P CNX 500 कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत.

लोकजीवन[संपादन]

साचा:मुख्य साचा:माहितीचौकट राज्य प्रतिके महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी. (चौ.कि.मी.) इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्रजी सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. वायव्य महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.

राज्यात ८०% हिंदू, ६% बौद्ध, १२% मुस्लिम, १% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. काही प्रमाणार शीख, ज्यूपारशी धर्मीय देखील आहेत.

लोकसंख्येचे घनता[संपादन]

सन २०११ च्या जनगणनेनुसार,महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ३६५ प्रति चौरस किमी इतकी झाली आहे. सन २००१ मध्ये ती ३१५ इतकी होती.[४]

संस्कृती[संपादन]

जेजुरी देवस्थान, पुणे जिल्हा

महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतके जुनी आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबादजवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगडसिंधुदुर्ग ही काही उदाहरणे. महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड अभंग आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारताच्या अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी'चे रचयिते), संत एकनाथ, संत तुकाराम, पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति - पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.

त्र्यंबकेश्वर, नाशिक

मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - दूरदर्शन-सह्याद्री, ABP माझा [१], कलर मराठी, झी मराठी, स्टार माझा, मी मराठी, झी टॉकीज, झी २४ तास, आयबीएन-लोकमत आणि साम मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात.

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.

गणेशोत्सव

मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील खास महाराष्ट्राच्या राजधानीतील मुंबईमधील एक महत्त्वाची जात म्हणजे " कोळी ". ह्या मुंबईला संपूर्ण समुद्र किनारा लाभल्याने येथील समुद्र किनाऱ्यावर आद्य अवलंबून असणारा कोळी समाज हा मूळ मुंबईचाच आहे, असे म्हणण्यात काहीही वावगे ठरणार नाही. मुळात मुंबई हे बेटच सात भूभागांनी एकत्र बनण्यात आले आहे. ते म्हणजे कुलाबा, जुने स्त्रीचे बेट ( लहान कुलाबा ), माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या कोळीवाड्यांमुळे बनली आहे. ह्या कोळी लोकांत फार जातीचे लोक असून त्यांच्यात स्त्रिया लुगडे (चोळी-पातळ-फडकी) आणि पुरुष रुमाल आणि कान टोपेरा आणि शर्ट असे असते. कोळी नृत्य हे महाराष्ट्रातील लावणी नृत्यानंतर प्रसिद्ध आहे.

भारताच्या इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डीसुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.

दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमीगणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणाऱ्या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात.

स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली. ह्यात महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे हे अग्रणी होते.

महात्मा जोतिबा फुले

हवामान[संपादन]

राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या (Deccan Plateau) पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूरअहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतूच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग

भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. सध्या मुंबई शहरात मोनोरेल व पुणे शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहरे व खेड्यांत उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी बससेवाही असतात.

महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असे एकूण पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. नागपूरपुणे विमानतळांवर देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात. औरंगाबाद, रत्‍नागिरी, कोल्हापूरसोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग हा भारताच्या सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई–नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई व न्हावा-शेवा ही महाराष्ट्रातील मोठी बंदरे आहेत.

मुख्य शहरे[संपादन]

  • मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारताच्या विविध भागांतून लोक रोजगारासाठी येथे मोठ्या संख्येने येतात.
  • पुणे - शिवाजीपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. शिक्षण आणि संशोधनसंस्था येथे मोठ्या संख्येने आहेत. पुणे शहर परिसरात आधुनिक उद्योगव्यवसाय मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या आघाडीचे शहर असा लौकिक पुण्याने मिळवला आहे.
  • नागपूरविदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.
  • औरंगाबाद - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या औरंगाबाद परिसरात मोठी आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.
  • नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहूर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
  • कोल्हापूर- शिवाजीच्या काळापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर येथे शिवाजी विद्यापीठ आहे.
  • सोलापूर- महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक प्रमुख शहर. एके काळी कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. येथील सिद्धेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध.
  • अमरावती- एक प्रमुख शहर. एके काळी कापूस उत्पादनात प्रसिद्ध होते. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे गांव. आधुनिक संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जिल्हा म्हणुन ओळख.
  • सातारा- मराठी साम्राजाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणारे शहर. या शहरात इतिहासाच्या पाऊलखुणा प्रखरतेने जानवतात. शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळख.
  • नांदेड- नांदेड हे गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. येथे औरंगाबाद प्रशासकीय विभागाचे उप मुख्यालय आहे. येथेच शीख धर्मीयांचे दहावे गुरु श्री गोविंदसिंग यांची समाधी (गुरुद्वारा) आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथेच आहे.

पर्यटन[संपादन]

साचा:मुख्य

वेरूळची लेणी

महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासासाठी चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त उपाहारगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्कन ओडिसी नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात.

महाराष्ट्रावरील ग्रंथसाहित्य[संपादन]

महाराष्ट्राच्या इतिहास-भूगोलावर आणि संस्कृतीवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही अशी:-

  • आधुनिक महाराष्ट्राचे राजकारण - लेखक वसंत सिरसीकर
  • मराठ्यांचा युद्धेतिहास - ब्रिगेडियर का.गं. पित्रे
  • महाराष्ट्र - लेखक प्रा. वि.पां. दांडेकर
  • महाराष्ट्र - एका संकल्पनेचा मागोवा - लेखक माधव दातार
  • महाराष्ट्र दर्शन (संपादक - सुहास कुलकर्णी)
  • महाराष्ट्र संस्कृती - लेखक पु.ग. सहस्रबुद्धे
  • महाराष्ट्र संस्कृती - प्रा. शेणोलीकर आणि प्रा. देशपांडे
  • महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास - लेखक प्रा. द.बा. डिकसळकर
  • महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास - लेखक डॉ. शं.दा. पेंडसे
  • महाराष्ट्रातील दुर्ग - लेखक निनाद बेडेकर

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ
  2. प्रा. काळे, भगवान (२३ जानेवारी १९८८). सन्युक्त महाराष्ट्र काल आणि आज. जालना: सन्केत प्रकाशन, जालना. pp. पान क्रमान्क् २९९. ISBN उपलब्ध नाही Check |isbn= value: invalid character (सहाय्य).
  3. "Population by religious community - 2011". 2011 Census of India. Office of the Registrar General & Census Commissioner. Archived from the original on 25 August 2015. 25 August 2015 रोजी पाहिले.
  4. लोकसंख्येचे घनत्व "Density of India" Check |दुवा= value (सहाय्य). २९ नोव्हेंबर, इ.स. २०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) इंग्लिश मजकूर

बाह्य दुवे[संपादन]

साचा:महाराष्ट्रातील जिल्हे साचा:महाराष्ट्र संस्था साचा:भारतीय राज्ये साचा:वाचक अभिप्राय हवा १

साचा:१७व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार